भारतातील बांगलादेशी घुसखोरीचा प्रश्न हा केवळ सीमावर्ती राज्यांपुरता मर्यादित न राहता आता देशात सर्वदूर पोहोचला आहे. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यांमध्ये या समस्येचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. नुकतेच गुजरातमधील अहमदाबादमध्ये या संदर्भात कठोर कारवाई करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांमुळे उद्भवलेल्या लोकसंख्यात्मक बदलांपासून ते विविध राज्यांतील राजकीय आणि प्रशासनिक प्रतिसादांचा सविस्तर आढावा येथे घेतला गेला आहे.
१. बांगलादेशी घुसखोरीमुळे गंभीर लोकसंख्यात्मक धोका असलेली राज्ये
महाराष्ट्र
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ३३ बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक केली असून, ६२ बनावट पासपोर्ट रद्द केले आहेत. भोसरी, चाकण, तळेगाव एम.आय.डी.सी, निगडी, सांगवी, दापोडी आणि देहूरोड या परिसरांमध्ये हे घुसखोर वास्तव्यास होते. (स्रोत:
लोकसत्ता).
या घुसखोरीमुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षा रचनेवर परिणाम होत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अभ्यासकांनी काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार घुसखोरीमुळे अनेक मतदारसंघाची लोकसंख्यात्मक रचना बदलली असून तेथील निवडणुकांच्या निकालावर परिणाम घडवून आणण्याची क्षमता परप्रांतीय आणि घुसखोरांना मिळाली आहे.
गुजरात
गुजरातमध्ये बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या राज्याच्या लोकसंख्यात्मक रचनेवर गंभीर परिणाम करत आहे. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा या शहरांमध्ये या घुसखोरांनी मोठ्या प्रमाणावर वस्ती केली आहे. अहमदाबादमधील चंदोला तलाव परिसर, ज्याला "मिनी बांगलादेश" म्हणून ओळखले जाते, येथे सुमारे
८,२०० अवैध बांधकामे आढळून आली आहेत, ज्यात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. या वसाहतींवर कुदळवाडी पॅटर्नने कारवाई देखील करण्यात आली.
आसाम
आसाम हे बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येचा सर्वाधिक फटका बसलेले राज्य आहे. आसाममधील ३३ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे लक्षणीय प्रमाण असल्याचा उल्लेख
एच.एस. ब्रह्मा समितीच्या २०१७ च्या अंतरिम अहवालात करण्यात आला आहे. या घुसखोरीमुळे स्थानिक लोकसंख्येच्या रचनेत बदल होत असून, सामाजिक आणि सांस्कृतिक तणाव वाढत आहेत.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असून, यामुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेच्या रचनेवर गंभीर परिणाम होत आहेत. मे २०२५ मध्ये, मथुरा जिल्ह्यातील खजपुर गावातील वीटभट्ट्यांवरून
९० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली, ज्यात २२ लहान मुलांचा समावेश होता. हे लोक १०-१५ वर्षांपासून भारतात अवैधरित्या राहत होते आणि त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आढळून आले.
पश्चिम बंगाल
टाइम्स ऑफ इंडियाच्या २०११ मधील अहवालानुसार, बांगलादेशी घुसखोरी आणि अल्पसंख्याक समुदायातील उच्च जन्मदर यामुळे पश्चिम बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, मालदा (२१.५०%), मुर्शिदाबाद (२१.०७%) आणि दक्षिण २४ परगणा (१८.०५%) या जिल्ह्यांमध्ये ही वाढ लक्षणीय आहे.
दिल्ली
दिल्लीमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांमुळे मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
यामुळे शहराच्या सामाजिक आणि राजकीय रचनेत बदल होत आहेत. या घुसखोरांनी झोपडपट्ट्यांमध्ये वस्ती करून स्थानिक संसाधनांवर ताण निर्माण केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर आम आदमी पक्ष सत्तेतून बाहेर गेल्यापासून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नव्या सरकारच्या समान भूमिकेमुळे आता दिल्ली पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
त्रिपुरा
त्रिपुरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्याचे अलीकडील घटनांवरून स्पष्ट होते.
मार्च २०२५ मध्ये, त्रिपुरा पोलिस आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांनी २९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या अटकांमध्ये महिलांचा आणि मुलांचा प्रामुख्याने समावेश होता. या व्यक्तींनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ओडिशा
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ओडिशा विधानसभेत दिलेल्या
माहितीनुसार, राज्यात ३,७४० बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटली आहे. त्यामध्ये केंद्रपाडा (१,६४९), जगतसिंहपूर (१,११२) आणि मलकानगिरी (६५५) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
२. राज्यांच्या राजकीय नेतृत्वाची भूमिका
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध सुरू केलेला ‘कुदळवाडी’ पॅटर्न
पिंपरी-चिंचवडमधील कारवाईचे आश्वासन
पिंपरी-चिंचवड परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. भाजप आमदार महेश लांडगे यांनी या मुद्द्यावर लक्ष वेधल्यावर, फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले (स्रोत:
Loksatta). फेब्रुवारी २०२५ मध्ये पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम, भंगार व्यवसाय आणि अवैध धंद्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारून चार हजारापेक्षा अधिक अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवला. (
या संदर्भात येथे अधिक वाचा)
विधानपरिषदेत दिलेली माहिती
२०२१ ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात २,७६४ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी २,२३७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ५२७ जणांना देशाबाहेर पाठवण्यात आले आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. (स्रोत:
Sanatan Prabhat)
सोलापूर जिल्ह्यातील चौकशी
बांगलादेशी घुसखोर सोलापूर जिल्ह्यात अवैध कत्तलखाने चालवत असल्याच्या आरोपांवर उच्चस्तरीय चौकशी करण्याचे
आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारने घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी
विशेष तपास पथकांची (SIT) स्थापना केली आहे. या पथकांद्वारे घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने घुसखोरांना ठेवण्यासाठी
डिटेन्शन सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर्स घुसखोरांच्या ओळखीची पडताळणी आणि त्यांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातील.
महाराष्ट्रात उभारले जाणारे बांगलादेशी घुसखोरांचे डिटेन्शन सेंटर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना स्पष्ट केले की, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना थेट कारागृहात ठेवता येत नसल्याने, त्यांच्यासाठी स्वतंत्र डिटेन्शन सेंटर्स आवश्यक आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यासाठी जमीन दिली होती, परंतु ती डिटेन्शन सेंटर्सच्या निकषांना पूरक नव्हती, म्हणून पर्यायी जमीन अधिग्रहित झाली आहे. (स्रोत:
Business Standard)
प्रस्तावित डिटेन्शन सेंटर्सची स्थळे
बालेगाव, तळोजा MIDC: राज्य राखीव पोलीस दल (SRPF) ग्रुप XI च्या कार्यालयाजवळ एक डिटेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. हे सेंटर ड्रग्स विक्री, व्हिसा उल्लंघन किंवा लहान गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी असेल. (स्रोत:
The Indian Express)
नेरुळ, नवी मुंबई: बेकायदा घुसखोर तुरुंगातील कैद्यांमध्ये मिसळू नयेत अशी खबरदारी घेण्याच्या हेतूने २०१४ मध्ये, केंद्राने सर्व राज्यांना घुसखोरांसाठी
किमान एक डिटेन्शन सेंटर स्थापन करण्याचे सांगितले होते. २०१८ मध्ये, काही अशासकीय संघटना आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि आसाममधील विद्यमान सहा डिटेन्शन सेंटरमध्ये एकमेकांपासून वेगळे करून स्वतंत्रपणे बंदिस्त केलेल्या कुटुंबांची स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
९ जानेवारी २०१९ रोजी, केंद्र सरकारने '
२०१९ मॉडेल डिटेन्शन मॅन्युअल' प्रसिद्ध केले, ज्यामध्ये असे म्हटले होते की प्रत्येक शहर किंवा जिल्ह्यात, एक प्रमुख इमिग्रेशन चेकपोस्ट असणे व एक डिटेन्शन सेंटर असणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे २०१९ मध्ये, नवी मुंबईतील नेरुळ येथे १.२ हेक्टर क्षेत्रावर डिटेन्शन सेंटर उभारण्याचा
प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा गेली अनेक दशके चर्चेत राहिलेला आहे. तथापि, आधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या सत्ताकाळात महाराष्ट्र सरकारकडून बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात ठोस राजकीय भूमिका किंवा प्रभावी कारवाई केल्याचे दिसत नव्हते. परंतु आता परिस्थितीत बदल घडून आलेला स्पष्ट दिसतो. आता या विषयावर महाराष्ट्र सरकार ठोस आणि सक्रिय निर्णय घेत आहे, हे स्पष्ट दिसते आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी “वोट जिहाद पार्ट २” असे म्हणत बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट कागदपत्रांवर रोष व्यक्त केला आहे. हा या अवैध अतिक्रमणा विरोधातील एक स्पष्ट राजकीय आणि वैचारिक संकेत आहे. पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश, बांधकाम व्यावसायिकांना घुसखोरांची माहिती देण्याचे निर्देश, महसूल मंत्र्यांनी फसव्या जन्म प्रमाणपत्रांच्या विरोधात कायदेशीर सुधारणा जाहीर करणे, हे सर्व शासन पातळीवरची ठोस भूमिका सूचित करतात.
इतर राज्ये
गुजरात सरकारने बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी या महिन्यात अवैध बांगलादेशी नागरिकांना दोन दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा अल्टिमेटम दिला होता. या कारवाईत
अहमदाबादमध्ये ८९० आणि सुरतमध्ये १३४ घुसखोरांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली, राज्य सरकारने अवैध घुसखोरां विरुद्ध व्यापक मोहिम राबवली आहे.
आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) अद्ययावत करण्यात आली आहे.
परंतु या प्रक्रियेला देखील व्यावहारिक अडचणींना सामोरं जावे लागत आहे. आसाम-बांगलादेश सीमारेषेवर कुंपण घालण्याचे काम सुरू आहे, परंतु २६२ किमी लांबीच्या या सीमारेषेतील ९२ किमी भाग नदीने व्यापलेला असल्यामुळे हे काम आव्हानात्मक आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि इतर सुरक्षा यंत्रणा या भागात गस्त वाढवत आहेत.
उत्तर प्रदेशच्या वाराणसी झोनमध्ये सुमारे ३०० संशयित बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी
तपास सुरू आहे. त्यांच्या मूळ ओळखीची पडताळणी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारकडे माहिती पाठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरीच्या शक्यतेमुळे सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. बहराइच, लखीमपूर खेरी आणि महाराजगंज जिल्ह्यांमध्ये
गस्त आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. २०१७ ते २०२५ या कालावधीत, उत्तर प्रदेश सरकारने
१४२ स्लीपर मॉड्यूल्स नष्ट केली. या स्लीपर सेल्समध्ये प्रामुख्याने बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचा सहभाग होता. या कारवाईत १७३ अवैध घुसखोरांना अटक करण्यात आली.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यातील २,२१७ किमी लांबीची सीमा बांगलादेशी घुसखोरांसाठी जणू प्रवेशद्वारच ठरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर बांगलादेशी घुसखोरांना राजकीय हेतूंसाठी
संरक्षण देत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. काही अहवालांनुसार, स्थानिक राजकीय नेत्यांनी घुसखोरांना ओळखपत्रे देऊन त्यांना मतदार बनवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारवर सीमारेषेवर कुंपण उभारण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याची भूमिका घेतली आहे. ओडिशामध्ये, भुवनेश्वरच्या महापौर सुलोचना दास यांनी घुसखोरांच्या मुद्द्यावर संतुलित भूमिका घेतली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली आहे.
केंद्र सरकारचे निर्देश
केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीने बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे
निर्देश दिले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला २,३६० घुसखोरांच्या नागरिकत्वाची पडताळणी लवकरात लवकर
पूर्ण करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया वेगाने होईल.
कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून, बनावट ओळखपत्रे वापरून भारतात राहणाऱ्या या घुसखोरांनी अनेक ठिकाणी गुन्हेगारीला खतपाणी घातले आहे.
भिलाईतील बनावट कागदपत्रे प्रकरण याचेच उदाहरण आहे.